मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे,’ अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.
सांगली महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपने स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले, ‘आगामी महापालिकेवर भाजपचेच वर्चस्व राहणार असून, महापौरही भाजपचाच असेल. देशात, राज्यात आणि आता सांगली महापालिकेतही भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, याबद्दल विश्वास आहे.’
‘केंद्रात आणि राज्यात आमच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांना सत्तेतील योग्य वाटा देण्याचे आमच्या पक्षाचे धोरण राहिले आहे. त्याच धर्तीवर सांगलीतही रिपाई आठवले गट आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत स्वाभिमानी संघटनेला योग्य ते प्रतिनिधीत्व उमेदवारीमध्ये देण्यात आले आहे’, असेही ते म्हणाले.
‘महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत बाेलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले की, भाजपच्या विजयाच्या धडाक्याने विरोधक चांगलेच बिथरले असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत; मात्र सांगलीकर यंदा विरोधकांचे मनसुबे उधळून लावतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उमेदवारी देताना भाजपने सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचे धोरण असल्याचे भाष्य भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी केले आहे. त्यानुसार उमेदवारी देताना महिला आणि युवा वर्गाला चांगले प्राधान्य देण्यात आले आहे; तसेच मुस्लीम समाजातील नऊजणांना उमेदवारी देत सामाजिक समतोल साधला गेला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारांमध्ये डॉक्टर्स, वकील अशा उच्चशिक्षितांसोबतच उद्योजक आणि युवकांचाही समावेश करण्यात आला आहे.